आपला जिल्हा

तब्बल अडीच महिन्यांनंतर लालपरी रस्त्यावर

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाची बीड जिल्ह्यातील बस वाहतूक तब्बल अडीच महिने बंद होती. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून एस.टी. बससेवा जिल्ह्यातील आगारातून सुरू करण्यात येत असल्याचे एस.टी. महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

आगारनिहाय सुटणाऱ्या बस

१) बीड – परळी, नांदेड, परभणी, अंबाजोगाई, लातूर, औरंगाबाद, जालना, सोलापूर, पुणे, मुंबई
२) परळी – बीड, परभणी, लातूर, अंबाजोगाई, नांदेड, सोनपेठ
३) धारुर – बीड, अंबाजोगाई, केज, तेलगाव, पुणे
४) माजलगाव – लातूर, परळी, परभणी, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, बीड मार्गे मुंबई, गेवराई , आष्टी
५) गेवराई – माजलगाव, परभणी, नांदेड, शेवगाव, पुणे, जालना, औरंगाबाद
६) पाटोदा – पुणे, बीड, परळी, मुंबई
७) आष्टी – पुणे, स्वारगेट, अहमदनगर, मुंबई, बीड
८) अंबाजोगाई – बीड, परळी , औरंगाबाद, लातूर, अहमदपूर, पुणे, धारुर, परभणी

‘…तर बस सेवेचा विस्तार करू’

या सेवेस मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन अन्य मार्गावर विस्तारित बससेवा सुरु करण्याचे. नियोजन करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांनी एस.टी.बसमध्ये प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर वापरावे. शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करावे व राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा, असे प्रवाशांना आवाहन बीडचे विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी केले आहे.

ग्रामीण प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा

सोमवारपासून बीड जिल्ह्यात लालपरी अर्थात आपल्या हक्काची एस.टी. रस्त्यावर धावली याबाबत प्रवाशांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सोमवारी सुरू झालेली एस.टी.सेवा काही शहरांपुरतीच मर्यादीत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही एस.टी.सेवा लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना दळणवळणासाठी एस.टी. हेच हक्काचे वाहन आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्राधान्याने एस.टी.सेवा सुरू करण्यात यावी असे प्रवाशांनी सांगितले.

Comment here