आपला जिल्हा

वीरशैव समाजाचा दीपस्तंभ गेला

तपोरत्नं माजलगावकर महाराज शिवचरणी लीन; उद्या होणार समाधीविधी

माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू श्री तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगावकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगाव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. माजलगावकर महाराजांच्या जाण्याने देशातील सम्रगी वीरशैव समाज शोकसागरात बुडाला असून वीरशैवांचा आधारवड कोसळला, असल्याची प्रतिक्रिया हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी आपली शोकसंदेशात व्यक्त केली. दरम्यान, माजलगावकर महाराजांचा समाधीविधी उद्या शनिवार, ११ सप्टेंबर रोजी १० वाजता माजलगाव संस्थान मठ येथे होणार असल्याचे केदार महापीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी माहिती दिली.

माजलगावकर महाराजाचे निधन झाले त्यावेळी जगद्गुरू माजलगाव मठातच उपस्थित होते. महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने ते गुरूवार सायंकाळीच माजलगावी आले होते. या वेळी श्रीगुरू देवांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, अंबाजोगाईचे श्रीगुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज, पाथरीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, पूर्णा येथील श्री गुरू डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, माळकवठा येथील श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सह हजारो समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान माजलगावकर महाराजांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता मठाच्या आवारातच समाधीविधी करण्यात येणार आहे. गेल्या ६-७ दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगावकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. दि. २ डिसेंबर १९२७ साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उुरी त्यांचा जन्म झाला. परूताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली माजलगाव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. मठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकामध्ये महाराजांनी माजलगाव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगाव मठाचा विस्तार करून या मठाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वोच्य स्थानी नेण्याची त्यांची कामगीरी नेत्रदिपक आहे. सिध्दयोगी तपस्वी म्हणून सर्व जाती धर्मात लोकप्रिय ठरलेल्या माजलगावकर महाराजांना त्यांचे तपःसामर्थ्य पाहुन रंभापुरी महापीठाचे तत्कालीन जगदगुरू श्री वीरगंगाधार शिवाचार्य भगवत्पाद यांनी तपोरत्नं या उपधीने गौरविले. त्याच प्रमाणे वीरशैवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासातील त्यांचे अतुल्य योगदान लक्षात घेवून विद्यमान काशी जगदगुरू डॉ.श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी श्री क्षेत्र उद्धारक श्री प्रभु या उपाधीने सम्मानित केले आहे.

चंद्रशेखर शिवाचार्य नूतन मठाधिकारी

वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारे माजलगावकर महारज गेल्या एक महिन्यापासून शारीरिक व्याधीने ग्रस्त होते. गेल्या आठ दिवासात त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्री केदार जगदगुरू गुरुवार, दि ९ सप्टेंबर रोजी माजलगाव येथे आले असता एकूण स्थिती लक्षात घेवून माजलगांव मठाच्या उत्तराधिकार्‍याचा पट्टाभिषेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व लगलीच शुक्रवारी सकाळी ११.०० यांच्या उपस्थितीत माजलगाव मठाचे उतराधिकारी श्री चंद्रशेखर स्वामी यांचा पट्टाभिषेक केला. मठाच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण श्री ष.ब्र.१०८ चंद्रशेखर गुरु प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज असे करण्यात आले.

‘समाज बांधवांनी कोरोनाचे तंतोतंत पालन करावे’

तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांनी आयुष्यभर समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने समाज पोरका झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. माजलगावकर महाराजांचा समाधीविधी शनिवार, दि.११ सप्टेंबर रोजी १० वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने समाजबांधवांनी शासनाने दिलेले कोरोना बाबतचे नियम काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बबनआप्पा खुर्पे, विलासआप्पा लांडगे, सोमनाथआप्पा हालगे, सोमनाथआप्पा साखरे, ओंकारआप्पा खुर्पे, रविंद्र कानडे, प्रभाकरआप्पा वाघीकर, विलासआप्पा शेटे, प्रशांत खुर्पे, ‘वर्तमान’चे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी यांनी केले.

Comment here