आपला जिल्हा

लोकशाही जीवंत ठेवण्याची जबाबदारी आता खऱ्या अर्थाने पत्रकारांवरच : राही भिडे

माजलगावात मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळा रंगला

पत्रकारच समाजाचा खरा आरसा : आमदार संदीप क्षीरसागर

माजलगाव : सध्याचे राजकीय वातावरण पाहता लोकशाही जीवंत ठेवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पत्रकारांवरच आली आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी केले. त्या माजलगाव येथे गुरूवार दि १८ जानेवारी रोजी मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

माजलगाव एकता पत्रकार संघाच्यावतीने मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राहीताई भिडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार मोहनराव सोळंके, आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड, भाजपा नेते रमेश आडसकर, लोकपत्रकार भागवत तावरे आदींनी उपस्थिती होती. प्रारंभी प्रास्ताविक माजलगाव एकता पत्रकार संघाचे पत्रकार वाजेद पठाण यांनी केले. पुढे बोलताना राही भिडे म्हणाल्या, सध्याची राजकीय परिस्थिती विदारक असून लोकशाही धोक्यात आलेली असताना ती वाचवण्यासाठी आता पत्रकारांवर खरी जबाबदारी आली आहे. अध्यक्षीय भाषणात आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, पत्रकारिता हा व्यवसाय नसून ते व्रत आहे. पत्रकारच समाजाचा खरा आरसा आहे. लोकप्रबोधना बरोबरच राजकरण्यांना योग्य दिशा देण्याचे कामही पत्रकार करत असतात. माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात दि १८ जानेवारी गुरुवार रोजी हा मुकनायक व माजलगाव भूषण सन्मान सोहळा थाटात रंगला. मान्यवरांच्या हस्ते मूकनायक सन्मान आरोग्यदूतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, दैनिक मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रय नरनाळे यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच सन्मान भूमीपुत्रांचा यामध्ये अहमदनगर येथील महानगरपालिकाचे आयुक्त डॉ.विजयकुमार जावळे, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर व सा.बां.उपविभाग परळी येथील साहाय्यक अभियंता श्रेणी -२ दीपाली रामदास गिते तर माजलगाव भूषण पुरस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीनराव नाईकनवरे, ॲड.भानुदास डक, अॅड.रविंद्र कानडे, रामराजे रांजवण, डॉ.गणेश आगे, सरपंच सौ.सिमाताई भालचंद्र सोळंके, इम्रान ताहेर सलीम खान, तलाठी सुर्यकांत गवई, ग्रामसेवक महेश गेंदले यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजलगाव एकता पत्रकार संघाचे पत्रकार ज्योतीराम पांढरपोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजलगाव एकता पत्रकार संघाच्या वतीने अमर साळवे, राजेभाऊ पाष्टे, बालासाहेब उफाडे, नय्युम आत्तार, वसंत परसे, यांनी परिश्रम घेतले.

पत्रकारांनी वंचितांचा आवाज बनावे : वसंत मुंडे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, पत्रकारांनी वंचितांचा आवाज बनावे. सामान्य माणसांची प्रश्न समजून घेत त्यावर पत्रकारांनी आवाज उठवण्याची खरी गरज आहे. माजलगाव एकता पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारासह माजलगाव तालुक्यातील सामाजिक कार्यात, आरोग्यरूग्ण सेवेमध्ये, उद्योजक, सहकारासह इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बीड जिल्हा आणि माजलगाव तालुक्याच्या मातीतील व्यक्तीस मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन गेल्या चार वर्षापासून सन्मानित करण्यात येते. यंदाचे हे ५ वे वर्ष आहे.

आंदोलने उभी करण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारांमध्ये : भागवत तावरे 

समाजातील शेवटच्या घटकांची प्रश्न मांडणारा पत्रकारच असतो. सामाजिक आंदोलने उभी करण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारांमध्येच असते. पत्रकार हा लोकांचा आवाज असतो, असे प्रतिपादन पत्रकार भागवत तावरे यांनी केले. मूकनायकचे मानकरी संपादक बाबा श्रीहरी देशमाने यांनी मनोगत मांडताना सांगितले, माझे अनेक राज्य, देश पातळीवर अनेक सन्मान झाले मात्र माझ्या मातीतला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.

Comment here