आपला जिल्हा

परळीत आज ब्रह्मवृंदांचे ‘ऐक्य’

राज्यभरातील समाजबांधव एकवटणार : बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ : पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथून सकल ब्राह्मण ऐक्याचा ‘हुंकार’ पुकारण्यात आला आहे. परळी वैजनाथ येथे आज २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण एक दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजप राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परिषदेसाठी संत-महंतांचे आशीर्वच व विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे. राज्यातून सकल ब्राह्मण समाज एकवटणार असुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथील हालगे गार्डन येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवशीय राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद सकाळी ९ ते सायं.७ या वेळेत होणार आहे. सकाळी ९:३० वाजता धर्मध्वज पूजन व ध्वजारोहण सोहळा होईल. सकाळी १०.०० वाजता उद्घाटन सोहळा होणार असून उद्घाटक म्हणून धनंजय मुंडे (कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, बीड जिल्हा), पंकजाताई मुंडे (माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव, भाजपा) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नमिताताई मुंदडा (सदस्य, केज विधानसभा मतदारसंघ) या उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे प.पू.सुधीरदास महंत (काळाराम मंदिर, नाशिक), धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराज, प.पू.विनायक महाराज फुलंब्रीकर,प.पू. बहुसोमयाजी श्री.यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांचे आशिर्वचन होणार आहे. या सत्रात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार स्व.श्री. भरतबुवा रामदासी स्मृती राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मोहन धुंडिराज दाते (पंचांगकर्ते, ​​सोलापूर) यांना, भागवताचार्य स्व.श्री.वा.ना.उत्पात स्मृती राज्यस्तरीय प्रेरणी पुरस्कार डॉ.मंजूषा पंढरीनाथ कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई,) यांना तर रणरागिणी स्व.ॲड.अपर्णाताई रामतीर्थकर स्मृती राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार सौ. उज्ज्वला जितेंद्र शर्मा-गौड (संस्थापक अध्यक्षा रणरागिणी महिला विचार मंच, पुणे ) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेत विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० श्री.सुशील कुलकर्णी (संपादक, ॲनालायजर) विषय ‘आता उठवू सारे रान…!, श्री.विवेक देशपांडे (प्रथितयश उद्योजक) विषय-आर्थिक भक्क्रमताः चला, उद्यमी बनूया, ब्राह्मण संघर्षकन्या केतकी चितळे (प्रसिद्ध सिनेअभिनेत्री) विषय-आपबिती ब्राह्मणांचे दमन, मुस्कटदाबी आणि धैर्य,पंचांगकर्ते श्री मोहन दाते विषय-ब्राह्मणः कालसुसंगत शास्त्रार्थ व धर्माचरण, डॉ.मंजूषाताई कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई,) विषय ब्राह्मण युवती-ज्ञानज्योती संस्कार, संस्कृती व कालसापेक्ष आचारण, उज्वला जितेंद्र शर्मा-गौड (अध्यक्षा- रणरागिणी महिला मंच, पुणे) विषय- ब्राह्मण मातृशक्ती, जागी हो – ब्रह्मशक्तीचा धागा हो यांचे मार्गदर्शन होणार आहे.दुपारी १:००ते १:१.३० श्री.निलेश बिपीन देशपांडे बासरी वादन होईल. मध्यांतर दुपारी १:३० ते २:०० स्नेह भोजन अशी रुपरेषा आहे.

द्वितीय सत्रात दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत श्री.सुरेंद्र चतुर्वेदी, उज्जैन (राष्ट्रीय अध्यक्ष ब्राह्मण महासभा) विषय-ब्राह्मण ऐक्य, एकत्रीकरण आणि एकसूत्र, प्रा.महेश पाटील (शिक्षणतज्ञ) विषय-शैक्षणिक दशा व दिशा नव्या संधी, आव्हाने व पर्याय, श्री.भूषण धर्माधिकारी (संचालक- ध्रुव IAS ॲकॅडमी, मुंबई) विषय : अमृत योजना मार्गदर्शन, श्री.विवेक कुंभेजकर(संस्थापक अध्यक्ष ब्रह्म ॲग्रो) विषय-ब्राह्मणांनो शेतीनिष्ठ व्हा!, प्रा.दीपक कासराळकर (प्रसिद्ध व्याख्याते) विषय-नात्यांवर बोलू काही, श्री.श्रीपाद कुलकर्णी (संस्थापक अध्यक्ष BBNG) विषय-ब्राह्मण बिझनेस नेटवर्क मार्गदर्शन, प्रा.डॉ.विजय पाटील (प्रसिद्ध वक्ते मुंबई) विषय- अस्मिता जागृती: ब्राह्मणांनो कधीतरी जातिवंत ब्राह्मण व्हा! यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील पौरोहित्य करणाऱ्या ब्रह्मश्री पं.गजानन ज्योतकर, ब्रह्मश्री पं.विजय पाठक, ब्रम्हश्री पं.शशांक निळेकर या ब्रह्मवृंदांचा गौरव होणार आहे.ब्राह्मण ऐक्य परिषदेत राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव होणार आहे. यामध्ये समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान होणार आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परळी वैजनाथ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा वैद्यनाथ भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.तर पौरोहित्य वर्गवारीत ब्रह्मश्री, महिला वर्गवारीत राज्यस्तरीय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींचा बह्मभूषण मनस्वीनी पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. विविध कला, क्रीडा, कथा, कीर्तन, प्रबोधन, शिक्षण, माहिती प्रसारण, संस्कृती रक्षण या वर्गवारीत ब्रह्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत. विविध संघटनात्मक काम करून ब्राह्मण संघटन मजबूत करणाऱ्या संघटना प्रमुखांचा गौरव ब्रह्मार्जुन पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. या ब्राह्मण ऐक्य परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

Comment here