महा-राष्ट्र

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून…
अमर हबीब

19 मार्च रोजी आपण सगळे शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करू

19 मार्च का?
19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता.महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकर्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात.

सहवेदना

अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात या साठी मी काय करू शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्याना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकाऱ्याना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे!



उपवास आणि उपोषण

हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे. आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करु शकतो. खूप केले देवा-नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱ्यांसाठी! याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू.
सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.

अन्नत्याग का?

१) साहेबराव करपे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
२) शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करणे. 
३) शेतकऱ्यांप्रती आपली बांधीलकी बळकट करणे.
४) शेतकऱयांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करून विरोध करणे.
५) शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे.

पदयात्रा

डॉ.राजीव बसरगेकर यांनी ठरवले की ते 11 मार्चला औंढा नागनाथ येथे महादेवाला साकडे घालून पदयात्रा सुरू करीत. 19 मार्चला चिलगव्हाणला पोचतील. त्यांच्या सोबत पदयात्रा करायला अनेक जण तयार झाले आहेत. तुम्हाला शक्य असेल तर या पदयात्रेत तुम्हीही सामील होऊ शकता. पूर्ण यात्रेत वेळ देणे शक्य नसेल तर 19 मार्चला महागाव येथे या. तेथून 8 किलोमीटर चालत चिलगव्हाणला जाता येईल. 

पदयात्रेचा मार्ग 

औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशा सुमारे सव्वाशे कि.मी.च्या पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे ठरवण्यात आला आहे. ११ मार्च- औंढा नागनाथ- येहळेगाव- डिग्रस- कऱ्हाडे, 12 मार्च- डिग्रस- कऱ्हाडे- हिंगोली- खानापूर चिं., 13 मार्च- खानापूर चिं.- कळमनुरी- माळेगाव, 14 मार्च- माळेगाव- बाभळी- शेंबाळ पिंपरी, 15 मार्च- शेंबाळ पिंपरी- मुळावा- पळशी, 16 मार्च- पळशी-मरसुळ- उमरखेड- सुकळी, 17 मार्च- सुकळी- नांदगव्हाण- बिजोरा, 18 मार्च- बिजोरा- मुडाना- महागाव, 19 मार्च- महागाव ते चिलगव्हाण.

सामूहिक श्रद्धांजली

चिलगव्हाण येथे सकाळ पासुनच  वर्दळ राहील. अकरा वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांचे कीर्तन होईल. त्या नंतर अनेक मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील. दुपारी 3 वाजता शोकसभा सुरू होईल. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकर्याना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम संपेल. 

शिस्त 

१) हे उपोषण कोण्या एका संघटनेचे किंवा कोण्या एका पक्षाचे नाही. ज्यांना शेतकाऱ्याबद्दल बांधिलकी वाटते त्या सर्वानी एकत्र येऊन करणे चांगले. अशा स्थितीत आपले सर्व अभिनिवेश बाजूला ठेवावे.
२) एकत्र न येताही आपण आपल्या बॅनर खाली उपोषण करू शकता. एवढेच नव्हे तर एकट्याने उपवास करू शकता.
३) या उपोषणाच्या निमित्ताने कोणताही वाद उपस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी. 

एका अत्यंत गंभीर विषयावरील हे उपोषण आहे, त्याचे तेवढे गांभीर्य कायम ठेवावे.

विशेष सूचना

1) हे उपोषण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करता येईल. सार्वजनिक उपोषण 10 ते 5 या वेळेतही करता येईल.
2) डायबेटीज किंवा अन्य रुग्ण वा वृद्ध व्यक्तीने आपल्याला झेपेल एवढ्याच वेळेपुरते उपोषण करावे.
3) विद्यार्थ्यांनी व लहान मुलांनी दोन मिनिटे मौन पाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे स्मरण करावे.

शेतकाऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आल्या आहेत. दर वर्षी हजारो आत्महत्या होत आहेत. आपल्या अवती भोवती वणवा पेटला आहे. तो विझवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. सर्जकाना स्वतंत्रपणे सुखाने व सन्मानाने जगता यावे यासाठी ही धडपड आहे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने त्यात सहभागी व्हावे!

Comment here